
इचलकरंजी : भाजपाच्या संघटन पर्व अंतर्गत गाव/वस्ती चलो अभियान अंतर्गत शनिवारी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते, जुने कार्यकर्ते, मिसाबंदी आणीबाणी, कारसेवक यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजी पश्चिम, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी पूर्व तर आमदार राहुल आवाडे यांनी ग्रामीण भागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात संघटन पर्व अंतर्गत गाव/वस्ती चलो अभियान सुरु करण्यात आले आहे. त्या अंतर्गत लाभार्थी संपर्क, स्वच्छता अभियान, मन की बात कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शनिवारी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी पूर्व तर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजी पश्चिम भागात असलेल्या ज्येष्ठ आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या त्याचबरोबर कारसेवक, आणीबाणी तसेच मिसाबंदीमध्ये अटकेत कार्यकर्ते नागरिकांच्या घरी जावून थेट संपर्क साधला. यावेळी त्यांच्यासोबत गप्पा-गोष्टी करतानाच माहिती जाणून घेण्यासह पक्ष बळकटीसाठी सक्रीय रहात मार्गदर्शन करण्याच्या सूचना व विनंती केली. त्याचबरोबर आमदार राहुल आवाडे यांनीही ग्रामीण भागात चंदूर, कबनूर, कोरोची, खोतवाडी याठिकाणी जुन्या व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष अमृत भोसले, सुनिल पाटील, बाळासाहेब कलागते, दिपक पाटील, मारुती पाथरवट, सौ. उर्मिला गायकवाड, महेश पाटील, बाळासाहेब माने, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच फिरोज शेख, संजय जिंदे, सुधाकर कदम, स्वाती कदम, मारुती पुजारी, विजय कांबळे, वसंत येटाळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, रविवार 27 रोजी सकाळी 7 वाजता श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच सकाळी 11 वाजा मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.