
इचलकरंजी |
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर गोपाळ जोशी यांची भारतीय शुगर या संस्थेच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
साखर उद्योगाच्या शाश्वत, हरित आणि उत्पादनक्षम भविष्यासाठी प्रवास (समस्या व उपाय) या विषयावर भारतीय शुगर पुणे यांच्या वतीने कोल्हापूरात दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा पार पडली. देशभरातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचे पदाधिकारी, तांत्रिक सल्लागार, संस्था तसेच मशिनरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी मनोहर जोशी यांची भारतीय शुगर या संस्थेच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
मनोहर जोशी यांनी जवळपास 40 वर्षे आर्थिक शिस्त, कारखान्यांचे पुनरूज्जीवन, उपपदार्थामधून उत्पन्न आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंगीकारासाठी केलेले मोलाचे योगदान यांचा उल्लेख करीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी अभिनंदन करत निवडीचे पत्र देवून सत्कार केला. तांत्रिक सत्रामध्ये सीबीजी निर्मिती, झिरो लिक्वीड डिस्चार्ज, ऊस बायोमासचा वापर, इथेनॉल उत्पादन व ऊर्जा संवर्धन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या चर्चेमुळे कारखाने, शेतकरी आणि कामगार वर्गाच्या शाश्वत विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
