
कारभार, कारवाई आणि जागर – आता तरी डोळे उघडणार का?
इचलकरंजी | विनायक कलढोणे
गेल्या काही दिवसांपासून शिक्षण संस्थांमधील कारभार, विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण, आणि तथाकथित ‘आप्पांच्या श्रद्धा’च्या नावाखाली चालणाऱ्या शैक्षणिक पिळवणुकीचा विषय चव्हाट्यावर आला आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, उघडकीस आलेले आर्थिक व मनोवैज्ञानिक शोषण यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काही ठोस हालचाली सुरु झाल्या आहेत.
महापालिकेने वादग्रस्त भूखंड सील करत संबंधित शिक्षण संस्थेला धडा शिकवला आहे. याशिवाय, या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी, विद्यार्थ्यांवर लादले जाणारे जबरदस्तीचे शुल्क, आणि मर्जीनुसार लादले जाणारे “आप्पांवर श्रद्धा” हे व्यवस्थापनाचे धोरण – या सर्व गोष्टी तपासाच्या कक्षेत आल्या आहेत.
तिसऱ्या भागात आपण या गोंधळातून बाहेर पडण्याचे उपाय पाहतो. प्रशासनाने केवळ कारवाई करून थांबू नये, तर दीर्घकालीन धोरण आखून पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि संस्था यांच्यात पारदर्शक नातं निर्माण करणे गरजेचे आहे. दरम्यान, पालकांनी देखील “ब्रँडेड शिक्षणसंस्था” या गोंडस नावांमागे न धावता संस्थेतील व्यवस्थापन, स्टाफची पार्श्वभूमी, आणि विद्यार्थ्यांची मानसिक जडणघडण या गोष्टींची चौकशी करूनच प्रवेश द्यावा.
महापालिकेने वादग्रस्त भूखंड सील करून सुरुवात केली आहे. आता प्रशासनाने या घटनांचे गांभीर्य ओळखून शिक्षण संस्थांवर नियंत्रण यंत्रणा बसवणं अत्यावश्यक आहे.

पालकांची जबाबदारी मोठी : या व्यवस्थेसोबतच पालकांची जबाबदारीही मोठी आहे. केवळ नाव, ब्रँड, किंवा “आप्पा म्हणाले की देव बोलले” अशा भ्रमात न पडता संस्थेचा आचारसंहिता, कर्मचाऱ्यांची वागणूक, आणि आपल्या मुलावर होणारा मानसिक परिणाम लक्षात घेत निर्णय घेणे गरजेचे आहे. आज जर आपण झोपेचे सोंग घेत राहिलो, तर उद्याचा ‘यश यादव’ कुठल्या तरी दुसऱ्या वर्गात बसलेला असेल… आणि तो पुन्हा गमावला गेला, तर त्याची जबाबदारी कोणाची?
विद्यार्थ्यांनी घ्यायची काळजी: विद्यार्थ्यांनी संस्थेतील अंधश्रद्धा, दबावयुक्त वातावरण किंवा अमानवी अपेक्षांकडे आंधळेपणाने स्वीकार न करता विचारपूर्वक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे.
कोणतीही गोष्ट आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असेल, अभ्यासाऐवजी भीती वाटत असेल, तर लगेच मित्र – मैत्रीण, पालकांशी किंवा विश्वासू शिक्षकांशी संवाद साधावा. गप्प बसणं म्हणजे सहमती नाही – ही जाणीव ठेवून आपणच आपल्या हक्कांसाठी उभं राहिलं पाहिजे.
श्रद्धा बाळगा – पण विचारांवर, विवेकावर आणि न्यायावर!
अंधश्रद्धेच्या नशिबावर शिक्षण चालत नाही; ती चालते विचारांवर, जागरूकतेवर आणि जबाबदारीवर.
हा जागर सुरू होणं हीच या मालिकेची खरी अपेक्षा!