
इचलकरंजी | प्रतिनिधी
इचलकरंजीतील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या गंभीर पार्श्वभूमीत आता पोलिसांच्या “करिअर मार्गदर्शन शाळा” उपक्रमावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असतानाही संबंधित पोलीस ठाण्याकडून आठवडाभर कुठलीही अधिकृत माहिती माध्यमांना देण्यात आलेली नाही.
राज्य शासनाकडून डिजिटल मीडियाला मान्यता असूनही, काही पोलीस ठाण्यांकडून आजही डिजिटल मीडियाकडे दुजाभाव केला जातो, हे या प्रकरणातून स्पष्टपणे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, यश यादव याच्या प्रकरणात पारंपरिक माध्यमे मौन बाळगत असताना डिजिटल मीडियाने सातत्याने आवाज उठवत न्यायासाठी प्रयत्न केले. मात्र, पोलीस प्रशासनाने संबंधित शैक्षणिक संस्थेची बाजू घेत कारवाई टाळल्याचा आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर गावभाग पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित आत्महत्या प्रकरण घडली असल्याने, सदर उपक्रम हा केवळ प्रकरण दडपण्यासाठीच आहे, असा स्पष्ट संशय नागरिकांत व्यक्त होत आहे.
या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे यांनी माहिती देताना सांगितले की, “या कार्यक्रमामध्ये काही विशिष्ट शैक्षणिक संस्थांचा प्रच्छन्न हस्तक्षेप दिसून येतो आहे. त्यामुळे ‘डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना’ने या कार्यक्रमापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे.
संवादाच्या नावाखाली सत्य दडपले जाऊ नये, यासाठी हा निषेध आवश्यक आहे.”सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि माध्यम स्वातंत्र्यावर नव्याने चर्चा रंगत असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील निर्णय अधिक सजगपणे घेतले जातील, अशी अपेक्षा डिजिटल माध्यमांनी व्यक्त केली आहे.